आ.अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पणन मंत्र्यांनी दिली मान्यता
अमळनेर-येथील सीसीआयचे कापूस खरेदी बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला असताना आ.अनिल पाटील यांनी शासन दरबारी पणन मंत्र्यांकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे यश येऊन मंत्रीमहोदयांनी हे केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.यामुळे परिसरातील शेतकरी राजास मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या महिन्यापर्यंत अमळनेरात कापूस खरेदी केंद्र सुरू होते,यादरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नोंदणी होऊन बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस मोजला गेला परंतु जिनिंगची क्षमता आणि लॉक डाऊन मुळे कमी असलेली मजुरांची संख्या यामुळे दररोज 50 वाहन मोजले जात होते,यासाठी मोठमोठ्या रांगा शेतकऱ्यांच्या लागत होत्या,यानंतर खरेदी केंद्राच्या लामा जिनर्स मध्ये मोठी आग लागल्याने खरेदी केंद्र बंद पडले यानंतर पारोळा जिनिंग येथे कापूस खरेदीची व्यवस्था करण्यात आली होती,अडचणीमुळे कालांतराने हे केंद्रच बंद झाल्याने शेतकरी बांधवांची मोठी निराशा झाली.आधीच शेतकरी कोरोना लॉक डाऊन मुळे त्रस्त असताना व घरात कापूस शिल्लक असताना कापूस खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता.यामुळे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांची ही व्यथा समजून घेत हे खरेदी केंद्र पुन्हा सुरू होण्यासाठी पणन मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला अखेर मंत्र्यांनी यास हिरवा कंदील दिल्याची माहिती आ पाटील यांनी दिली असून साधारणपणे पुढील आठवड्यात लवकरात लवकर हे केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.हे शासन जनतेचे आणि बळीराजाचे असल्याने कोणत्याही शेतकरीं बांधवांचे नुकसान होऊ देणार नाही.यामुळे कुणीही चिंता करू नये,संपूर्ण शेतकऱ्यांचा कापूस शासन खरेदी करेल असा विश्वास अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
