शिक्षकांनी विद्यार्थ्यांची सृजनशीलता ओळखून अध्यापन करावे. प्रत्येक विद्यार्थी बुद्धीवान व सृजनशील असतो.बदलत्या जगाच्या जाणिवेतून अध्यापन कौशल्य वृद्धींगत केले तर नव्या पिढीतील विद्यार्थी नक्कीच सृजनशील होतील. बुद्धीचा विकास हे शिक्षणाचे ध्येय आहे असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ बाबा नंदनपवार (नागपूर) यांनी केले. यावेळी व्यासपीठावर खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल,लो.टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, योगेश मुंदडे,निरज अग्रवाल,विवेकानंद भांडारकर,वसुंधरा लांडगे आदी उपस्थित होते.
येथील लो.टिळक स्मारक समितीच्या शतक महोत्सवी सांगता समारोहानिमित्त खा.शि.मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बजरंगलाल अग्रवाल यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीस सौ.स्नेहा एकतारे यांनी स्वागत गीत सादर केले. श्री बाबा नंदनपवार संवाद साधतांना पुढे म्हणाले की,माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे शिक्षण सर्वव्यापी झाले आहे. शिक्षणासह अपेक्षा वाढल्या आहेत. परीक्षेतील गुणांना अधिक महत्व न देता विद्यार्थी घडवणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता,
कल्पकता,नवनिर्मितीचा शोध घ्यावा असेही ते म्हणाले. कार्यक्रमास प्रा.डॉ.प्र.ज.जोशी, शशिकांत घासकडबी(नंदुरबार),दिनेश नाईक,सोमनाथ ब्रह्मे,अनिल घासकडबी,संजय एकतारे,जे.डी.निकुंभ आदींसह शिक्षक व शिक्षणप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मेखा सर यांनी तर आभार प्रदर्शन आत्माराम चौधरी यांनी केले.
