राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील 29 गावांना मंजुरी-आ शिरीष चौधरी
14 कोटी 40 लाखांचा निधी,सर्व गावांचा पाणीप्रश्न सुटणार
अमळनेर( )राष्ट्रीय ग्रामिण पेयजल आरखाड्यांतर्गत अमळनेर तालुक्यातील 29 गावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी 14 कोटी 40 लाख एवढा भरघोस निधी मंजूर झाल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.आ चौधरी यांनी 2018-19 मध्ये मतदार संघाचा आराखडा मंजूर करून घेतल्यानंतर वरील 29 गावांना पेयजल योजना मंजूर व्हावी यासाठी पाणीपुरवठा मंत्री ना बबनराव लोणीकर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला व संबधित गावांची पाण्याची समस्या निदर्शनास आणून दिली त्याचेच फलित म्हणून ही मंजुरी मिळाली असून यामुळे वरील सर्व गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
विशेष म्हणजे या पाणीपुरवठा कामाना प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झाली असून या मंजुरी अंतर्गत पाण्याच्या स्रोता पासून गावापर्यत पाइपलाइन आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी साठवण करण्यासाठी पाण्याची टाकी उभारली जाणार असल्याचे आमदारांनी सांगितले.दरम्यान प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा मुख्यमंत्री टप्पा 2 मध्ये समावेश करावा यासाठी आमदार चौधरी यांनी 17 जून 2016 रोजी नामदार बबनराव लोणीकर, मंत्री पाणीपुरवठा महाराष्ट्र राज्य यांच्याशी पत्र व्यवहार केला होता, यावर प्रधान सचिव (पाणीपुरवठा) यांनी तपासून अहवाल सादर करावा असे आदेश मंत्र्यांनी दिले होते, यानंतर प्रस्ताव सादरीकरण करण्याचे काम सुरू होते ,मात्र सदर कामात प्रगती न दिसल्याने आमदार चौधरी यांनी पुन्हा 17 ऑक्टोबर 2017 रोजी मंत्री लोणीकर यांना स्मरण पत्र दिले. यावर लोणीकर यांनी अतिरिक्त सचिवांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना टप्पा 2 मध्ये हे काम समाविष्ठ करावे असे आदेश दिले.मात्र या आदेशाबाबतही दिरंगाई दिसत असल्याने दि 14 मार्च 2018 रोजी पुन्हा आमदार चौधरी यांनी मंत्र्यांना स्मरण पत्र देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न क्र. 92063 उपस्थित केला.यामुळे यावर तात्काळ कार्यवाही होऊन उपाययोजना करण्याबाबत हालचाली सुरू झाल्यात, शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेलाच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना असे नाव देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार दिनांक 2017/18 व 2018/19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखडात अमळनेर मतदार संघातील एकूण 29 गावांसाठी 14 कोटी 40 लाख एवढा मोठा निधी मंजूर झाला.
मतदार संघातील समाविष्ट गावे निधी खालील प्रमाणे
भरवस- लोणपंचम 75 लाख, पिपळी प्र.ज 84 लाख, अंतुली- रंजाने 85 लाख, ख़ौशी बु 50 लाख, खेडी खु - कुर्हे सिम- व्यवहारदळे 50 लाख, कन्हेरे 40 लाख, एकतास 35 लाख, कावपिंप्री 50 लाख, इंदापिंप्री 50 लाख, बोर्दडे 30 लाख, सारबेटे बु 45 लाख, रूधाटी 35 लाख, टाकरखेडा 85 लाख, गडखांब-कचरे-माजर्डी 95 लाख, मोहाडी 30 लाख, शिरूड 98 लाख, वावडे 80 लाख, खेडी खु 37 लाख, मारवड 1 कोटी 25 लाख, कळमसरे 1 कोटी 30 लाख, अंबारे 36 लाख, खेडीढोक 60 लाख, दगडी सबगव्हान 35 लाख.
आ चौधरी यांनी हिरा उद्योग समूहाच्या माध्यमातून नाला खोलीकरण,शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना,आदी ठोस कामे करन्यासह पाडळसे धरण पूर्णत्वासाठीही भगीरथ प्रयत्न करत आहेत,व आता पुन्हा पेयजल कार्यक्रमांतर्गत 29 गावांना मंजुरी मिळविली आहे, यामुळे आ चौधरी यांचे विशेष कौतुक होत असून ग्रामिण भाग टंचाईमुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न सफल ठरत आहे.