जळगांव प्रतिनिधी
60000 जणांच्या पगारातून प्रत्येकी 1000 कपातीचा ठराव राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला सहा कोटी.
राज्यातील गाव पातळीवर शेवटचा कर्मचारी असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला सहा कोटी रुपये देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तशा आशयाचे पत्र सादर केले आहे .मार्च महिन्यातील वेतनातून प्रत्येक कामगाराचे एक हजार रुपये कपात करून तो सहायता निधी जमा करण्यात यावा असे या पत्रात म्हटले आहे.
राज्यात 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी आहेत प्रत्येक 1000 रुपये मिळून सहा कोटी रुपये सहायता निधी जमा होणार असल्याची माहिती युनियनचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील सचिव प्रदीप महाजन यांनी दिली. कोरोणाच्या प्रादुर्भाव झाल्यापासून कर्मचारी ग्रामस्थांचे समुपदेशन, विलगीकरण, औषधोपचार ,कामात मदत, वरिष्ठांना माहिती देणे, गावाची स्वच्छता ,पाणी शुद्धीकरण, माहिती फलक लावणे ,जंतुनाशक फवारणी, दवंडी देणे, आपत्कालीन माहिती ,गर्दी न होऊ देणे आदी कामे करत आहेत. ही कामे करताना जोखीम असूनही कर्मचारी प्रामाणिकपणे ती पार पाडत आहेत. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांना 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता तसेच 25 लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे.
राज्य महामारीच्या संकटात असतांना अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालून कामे करत आहेत. अशा स्थितीत राज्याला मदतीची गरज असल्याने कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी एक हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याचे श्री पाटील व महाजन यांनी सांगितले.
संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमारवार ,सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश पाटील, सचिव प्रदीप महाजन यांनी या निर्णयाबाबत राज्य पदाधिकाऱ्यांना सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.