अमळनेर प्रतिनिधी
पावसाच्या तुटीमुळे विदर्भ आणि मराठवाडा ऑगस्टमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून खान्देशातील बहुतांश भागात भीषण दुष्काळ पडला आहे. यंदाही अनेक ठिकाणी दुबार पेरण्या झाल्या आहेत. मात्र खानदेशात कृत्रिम पाऊस पडण्याची आवश्यकता नाही असे राज्य सरकारला वाटत असल्याचे दिसते.
शासनाला व मंत्र्यांना मराठवाडा व विदर्भातील दुष्काळ दिसतो मात्र उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नाकडे नेहमीप्रमाणे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून खानदेशात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लहरी पावसामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या हाता तोंडातला घास हिरावला जात आहे. मात्र तरीही सरकारचे उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत आहे. यंदा उत्तर महाराष्ट्रातील सत्ताधारी सर्व खासदार मोठ्या बहुमताने निवडून आले आहेत. गल्ली ते दिल्ली पर्यंत सर्व ठिकाणी भाजपच आहे. मात्र तरीही आपले लोकप्रतिनिधी मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत भूमिपूजन करण्यात मग्न आहेत. खानदेशावर नेहमी अन्याय होतो मात्र त्यावर एकही लोकप्रतिनिधी विधानसभेत बोलायला तयार नाही. आजच्या घडीला कृत्रिम पावसाची गरज खानदेशात आहे. त्यावर आमदार व खासदारांना बोलायची गरज आहे. नाहीतर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खानदेश वासियांना वेगळ्या खानदेश ची मागणी करावी लागू नये म्हणजे झाले.